भारताचे माननीय सरन्यायाधीश, माननीय न्यायमूर्ती श्री. भूषण रामकृष्ण गवई.

(जन्मतारीख) : २४/११/१९६०
पदाचा कालावधी : (नियुक्तीचा दिनांक) २४/०५/२०१९ ते (सेवानिवृत्तीचा दिनांक) २३/११/२०२५
दिनांक २४ नोव्हेंबर, १९६० रोजी जन्म झाला.
दिनांक २४ नोव्हेंबर, १९६० रोजी अमरावती येथे जन्म झाला. त्यांनी दिनांक १६ मार्च, १९८५ रोजी वकिली व्यवसाय सुरु केला आणि सन १९८७ पर्यंत त्यांनी कै. बॅरिस्टर राजा एस. भोंसले, माजी महाअधिवक्ता आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्यासोबत काम केलेले आहे. त्यांनी सन १९८७ ते १९९० या कालावधीत माननीय मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली व्यवसाय केला. सन १९९० नंतर त्यांनी प्रामुख्याने माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर वकिली व्यवसाय केला.
त्यांनी संविधानात्मक कायदा आणि प्रशासकीय कायदा यात वकिलीचा व्यवसाय केला. तसेच माननीय श्री. गवई हे नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी काउन्सेल होते. त्यांनी एस.आय.सी.ओ.एम आणि डी.सी.व्ही.एल. इत्यादी विविध स्वायत्त संस्था आणि महामंडळे आणि विदर्भ प्रदेशातील विविध नगर परिषदा यांच्या वतीने नियमितपणे हजर राहून काम पाहिले. त्यांनी ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ या कालावधीत माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहायक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून काम केले. त्यानंतर, त्यांची दिनांक १७ जानेवारी, २००० रोजी सरकारी वकील आणि सरकारी अभियोक्ता म्हणून नागपूर खंडपीठ येथे नियुक्ती झाली होती. दिनांक १४ नोव्हेंबर, २००३ रोजी त्यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली. त्यानंतर, दिनांक १२ नोव्हेंबर, २००५ रोजी ते माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायमूर्ती झाले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ तसेच नागपूर, औरंगाबाद आणि पणजी येथील खंडपीठांमध्ये नेमून दिलेल्या सर्व प्रकारच्या खटल्यांमध्ये न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे. त्यांना दिनांक २४ मे, २०१९ रोजी भारताचे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली.
मागील सहा वर्षांत त्यांनी अंदाजे ७०० खंडपीठांचा भाग होऊन वेगवेगळ्या विषयांवरील ज्यात संविधानात्मक कायदा, प्रशासकीय कायदा, दिवाणी कायदा, फौजदारी कायदा, वाणिज्य वाद, लवाद कायदा, विद्युत कायदा, शैक्षणिक प्रकरणे, पर्यावरणविषयक कायदा इत्यादी वेगवेगळ्या विषयांचा समावेश असलेली प्रकरणे हाताळली. त्यांनी कायद्याचे नियम कायम करणारे तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क, मानवाधिकार आणि कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्याबाबतच्या विविध वादप्रश्नांवरील घटनापीठांच्या न्यायनिर्णयांसह सुमारे ३०० न्यायनिर्णय दिले आहेत. ते उलानबातर (मंगोलिया), न्यूयॉर्क (यू.एस.ए.), कार्डिफ (यू.के.), नैरोबी (केनिया) येथील विविध जागतिक परिषदांना हजर होते. कोलंबिया विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठ यांसह विविध विद्यापीठे आणि संस्थांमध्ये त्यांनी विविध संविधानात्मक आणि पर्यावरणात्मक मुद्दे यांवर व्याख्याने दिली.
ते दिनांक २३ नोव्हेंबर, २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत.